गुरुवार, ३१ मे, २०१८

Video: The Wire Urdu's #InDino is back : Generally, when we talk about #Muslims of #Maharashtra, we end up talking about #Urdu speaking Muslims. Rarely, we talk about #Marathi speaking Muslims. In the latest episode of In Dino, I interview Researcher and Activist Muphid Mujawar about the portrayal of Muslims in Marathi literature, Muslim Marathi Literary Movement and the demand of Muslim Reservation in Maharashtra. 
माझ्या पीएचडी संशोधनाच्या विषयावर म्हणजेच मराठी साहित्य-सिनेमा-इतिहास इत्यादींमध्ये मुसलमानांचे प्रस्तुतीकरण, मुस्लिम मराठी साहित्य चळवळ आणि महाराष्ट्रातील मराठी मुसलमानांचे प्रश्न या विषयावर 'द वायर : उर्दू' चे संपादक मेहताब आलम यांनी घेतलेली मुलाखत.

रविवार, ८ मे, २०१६

अझरूद्दीन

खूप दिवसांपूर्वी लिहिले होते.... पण आज शेअर करतोय... प्रतिक्रिया-टीका अपेक्षित आहे...!
"आठवतंय मला ... जेंव्हा तू तुझ्या शैलीदार फलंदाजीने डोळ्यांचे पारणे फेडायचा. तू नुसत्या मनगटाच्या जोरावर मारलेले सुंदर फटके पाहण्यासारखे असायचे. स्लीप मध्ये क्षेत्ररक्षण करताना तू कित्येक झेल पकडलेस. किती आरामात तू धावा चोरायचास. अजय जेडेजा बरोबर तू कित्येकदा मोठी भागीदारी उभार्लीस. ........ पण हे तू खेळाडू म्हणून केलेस जसे सगळे खेळाडू करतात... पण स्टेडियम बाहेर ... शहरामध्ये ..गावामध्ये बरच काही घडत होते... ९२-९३ उलटून गेले होते ... नजरा दुषित झाल्या होत्या .... तू ज्या समाजातून आलास त्या समाजात असुरक्षितता वाढली होती. लोकांच्या जाणीवा-नेणिवा मध्ये त्या समाजाबद्दल , त्याच्या देशप्रेम बद्दल शंका निर्माण झाल्या किंवा केल्या गेल्या . अशा वेळी माझ्या लहानपणी मी पाहिल्याचे आठवतंय..... तू त्यांच्या साठी आयकॉन बनला होतास. कुणाच्या घरी नुकताच मुलगा जन्माला आला कि त्याचे नाव अझरूद्दीन ठेवायचे का? अशी चर्चा व्हायची. कित्येक मुलांचे नावे अझरूद्दीन अशी ठेवली गेली. माझ्या मामाच्या मुलाचे तसेच आत्याच्या नातवाचे नाव अझरूद्दीन असे ठेवले गेले. कोणी अझरूद्दीन नावाचा समवयस्क मुलगा भेटला कि वाह..काय मस्त नाव आहे याचे ...असे मनातल्या मनात वाटायचे.
पण काही लोकांच्या बोलण्यात जे माझ्या संपर्कातले होते , ते नक्कीच अपवादात्मक असतील ..त्यांच्या तुझ्या बद्दलच्या मत प्रदर्शनात तूझ्या बद्दल नेहमीच शंका घ्याचे...तुझ्या देशभक्ती बद्दल देखील ...जसे ते तू ज्या समाजातून आलास त्या समाजाबद्दल घ्याचे. पण तू त्या समाजासाठी एका प्रतीक सारखा भासत होतास ....... अशा ९२-९३ नंतर च्या परिस्तिथीमध्ये परीघावर फेकला गेलेला समाजासाठी तू त्यांच्या साठी कसा काय प्रतिक बनलास हे पाहणे इतिहासाचा अभ्यासक म्हणून मला महत्वाचे वाटले...... सानिया मिर्झा नंतरच्या काळात प्रतिक बनू लागली होती पण तुझ्या समाजाच्या धुरिणांनी स्कर्ट ...आणि टेनिस खेळण्यासाठी गरजेचे आखूड कपडे याचा मुद्दा पुढे केला. आणी तिने शेजारच्या देशातल्या पोराशी लग्न केले. त्यामुळे ती तुझ्या प्रमाणे तुझ्या समाजात प्रतिक म्हणून किंवा इडोळ म्हणून उभी राहू शकली नाही......
असो क्रिकेट मला खूप आवडायचे आणि मी आवडीने पाहायचो.....येत नसताना खेळायचो देखील.... पण तू फिक्सिंगच्या केस मध्ये अडकलास ..आणि तुझ्यावर बंदी आली...... मी क्रिकेट खेळणे-पाहणे-क्रिकेटवर बोलणे सोडून दिले. राग आला होता....
पण इतक्या वर्षांनी तुझ्या वरची बंदी उठली. आनंद वाटला जरी आता तुला खेळताना पाहता येणार नसले तरी..... मध्यंतरी तू खासदार पण झालास ...पण मला आनंद तुझ्या वरची बंदी उठल्या मुळे झाला......
पण राहून राहून वाटते ...... समाजाची स्मरणशक्ती क्षीण झाली आहे. ..... सगळे चिडीचूप आहेत...... नशीब तुझ्यावर बंदी आली त्यावेळी फेसबुक नव्हते नाही तर इतक्या पोस्ट आल्या असत्या तुला शिव्या-शाप देणाऱ्या ..... पण दुर्दैवाने आता तुझी बंदी उठली असून पण....आणि फेसबुक असून पण एक देखील पोस्ट माझ्या पाहण्यात आली नाही जी तुझे अभिनंदन करील.... असो......यालाच म्हणतात अनुलेखाने मारणे............
जेंव्हा माझ्या आजूबाजूचे तुमची टीम पाकिस्तानची असे सांगायचे आणि हिणवायचे .... त्यावेळी तूझे भारतीय क्रिकेट टीम मध्ये असणे खूप सुख देणारे......त्यांना उत्तर देण्यासाठी उपयोगी पडायचे...... कि.."आमची टीम इंडिया आहे आणि आमच्या टीमचा कप्तान अझरूद्दीन आहे......! ""

राष्ट्रगीत, शोएब्या आणि मास्तर

    शाळंला हुतो तवाची गोस्ट... काळाकुट्ट ...जबरी डोळे आनी आवाजाचा शोएब बारगीर नावाचं आडदांड आन् मागच्या बाकाला शोभणारा इद्यार्थी होता. त्याला किरकेटचं लई येड पन हुतं. नावच शोएब असल्यामुळं शोएब अख्तर आवडायचा.. म्हनून त्याची टीम पन आवडायची. म्हनजे पाकिस्तानची किरकेट टीम. भारत-पाक मॅच झाल्याच्या दुसर्या दिवशी जेवायच्या सुट्टीत वर्गातल्या मागच्या बाकड्यांवरच्या इतर काळ्या सावळ्या पोरां संगं त्याची चर्चा रंगून शेवटी वाद झडायचा. सगळं झालं की ही पोरं म्हणायची 'ए शोएब्या आर इंडियात राहतुस आन् पाकिस्तान कसं रे आवडतय तुला?' ह्यो म्हणायचा 'अरं पाकिस्तान कुठं आवडतय? पाकिस्तानची किरकेट टीम आवडत्ये. त्यो अख्तर बग एकदम रावळपिंडी एक्सप्रेस सारखा बाॅलिंग करतो... श्रीकांतला जमतं का?' ...... माझी शरीरयष्टी चांगल्या खात्यापित्या घरातल्या पोरासारखी त्यामुळं बाॅल माग पळायला आवडायचं न्हाय आन म्हनून किरकेट बी न्हाय आवडायचं... तरी कधी मधी कुनी पन ईचारायचं 'तुला कुटली टीम (किरकेट ची) आवडत्ये? ' इथं केबीसी वानी चार औपशन नसायचे. ईचारनारा दोनच औपशन द्यायचा... ' इंडिया की पाकिस्तान' .... त्यामुळं आपलं उत्तर इंडिया असायचं... त्यावेळी मला कुनी 'तुला कुटली टीम ( फुटबाॅलची) आवडत्ये ?' असं विचारलं असतं आनी 'इंडिया की ब्राझिल' असं औपशन दिलं असतं तर मीच काय कुनीबी 'ब्राझिल...... ललललला....ललललला....ब्राझिल....' असं उत्तर दिलं असतं... असो... तर शोएब्याचं पाकिस्तान किरकेट टीमवरचं प्रेम एव्हना पुढं बसणाार्या गोर्या गोमट्या पोरांसकट सगळ्या वर्गाला म्हाईत झालतं..... माझ्या सारख्या मागच्या बाक वाल्यांना खुप आधीपासून म्हनजे नववी पासून माहीत होतं.... मी एकदा त्याला बोल्लोपन की 'येडा बीडा हाय क्या? तूझे काय को पाकिस्तान की टीम आवडत्या रे?...' त्याने त्याचं ठरलेलं खरखुरं उत्तर दिलं.... मी म्हटलं ' येडे ** के तुझे लोका क्या कयींगें?...उनको जरा बी पटनला नई'... ही झाली नववीतली गोस्ट...दहावी सुरू हुती तवा कारगिल झालं हुतं.... आमच्या शाळंला ग्राउंड नसल्यानं चार पाच पोरी माईकवर प्रार्थना, प्रतिज्ञा आनी राष्ट्रगीत म्हनायच्या. आमी वर्गातली पोरंपोरी नुसता अँक्शन करायचो. वर्गातली वांड मेंबरं हे सगळं सुरू असताना कधी कधी एकमेकाला वाकुल्या दावत खिदळायची... शाळंचं शेवटचं वर्ष संपायला आलतं... प्रार्थना आनी प्रतिञा संपुन राष्ट्रगीत सुरू झालं... वांड मेंबरांचं वाकुल्या दावनं चालु व्हत्ं...... आपल्या काळ्याकुट्ट चेहर्याच्या बॅकग्राउंडवर आपले पांढरे शुभ्र दात चमकवत शोएब्या कुनाला तरी स्माईल देत हुता... पॅसेज मध्ये वर्गाच्या खिडकी समोर राष्ट्रगीता करीता स्तब्ध उभारलेल्या मास्तराने शोएब्याला हसताना बगितलं... राष्ट्रगीत संपलं आनी .. भारत माता की.... जय... वंदे .... मातरम्...या घोषनांना शोएब्या सकट सगळ्यांनी साथ दिली ... घोषना संपल्या संपल्या मास्तर तरा तरा वर्गात शिरला.... अन् थेट शोएब्या जवळ जाऊन त्याच्या कानाखाली आवाज काढला... 'लाज नाही वाटत का ? राष्ट्रगीत चालू असताना हसतोस ते...'.... 'साॅरी सर ...!' शोएब्या गाल चोळत बोलला.... 'साॅरी काय साॅरी......' मास्तर पुढं कायतरी बोलनार तवर मधल्या बाकावरचा पुढं पुढं करनारा गव्हाळ रंगाचा पोरगा म्हटला.. ' सर याला इंडियाची टीम पेक्षा पाकिस्तानची टीम जास्त आवडते' ..... त्याचं संपू पर्यंत पुढच्या बाकावरचा एक गोरा गोमटा हुशार पोरगा बोलला ..'सर हा कीनई इंडिया पाकिस्तान मॅचच्या वेळी पाकिस्तानला सपोर्ट करतो'..... पुढच्या बाकावरचा दुसरा गोरा गोमटा शोएब्याकडं जळजळीत कटाक्ष टाकुन बोला की ' होय सर... याला पाकिस्तान आवडतो आणि हा पाकिस्तानला सपोर्ट पण करतो..' हे आयकून मास्तरच्या तळपायाची आग मस्तकात गेली...त्याने शोएब्याला एका माग एक थोबाडीत मारायला सुरू केली... 'हरामखोर पाकिस्तान आवडतं का तुला? निर्ल्लज ..' मास्तर कडनं बसनार्या कानसुले झेलत झेलत शोएब्या आपली बाजू मांडत हुता...' सर.. नाय ओ.. पाकिस्तान नाय आवडत... नुसती टीम आवडत्या...' ......'अरे हरामखोरा नुसती टीम आवडते का तुला?' असे म्हनून मास्तरने शोएब्याच्या शर्टाला धरून त्याला बेंच मधनं भाईर वडून भिंतीकडं ढकलं... त्यात त्याचा शर्ट टारकन फाटला... भिंतीला घालून मास्तर त्याला बकाबक बुकलून काढत व्हता.... मास्तरची प्राणप्रिय शिस्त मोडून सगळा वर्ग भवतालच्या बेंचवर दाटीवाटीनं उभं राहून मास्तरची मर्दुमकी बघत होता.....हुशार पोरं 'याला अशीच शिक्षा मिळायला हवी...' 'याला असाच धडा शिकवला पाहिजे..' असं म्हनत व्हती... त्यनं मास्तर अजून चेकाळत हुता.... शेवटी विशीतल्या शोएब्याच्या ग्रहण शक्ती समोर चाळीशीतल्या मास्तरची मारक शक्ती कमी पडली... 'परत असं केलंस तर याद राख गाठ माझ्याशी आहे.' असं म्हनून वर्गशिक्षक असलेला मास्तर पुढे खुर्चीवर जाऊन बसला अन् हजेरी घेऊ लागला.... आपलं नाव आलं की पोर उभं राहून 'हजर' म्हनाय लागली.....तिकडं शर्टाच्या काॅलर पासून मना पर्यंत आपलं जे जे फाटलयं ते ते गोळा करून शोएब्या भरल्या डोळ्यानं आपल्या बाकावर बसला... मास्तर ने नाव पुकारले.. 'शोएब बारगीर'.... आपलं सगळं फाटलेलं गोळा करून सावरत शोएब्या उभं राहून द्रूढपने 'हजर' म्हनाला..... कोनती ही प्रतिक्रया न देता मास्तर हजेरी संपवून तास घेऊन निघून गेला... दुसरा मास्तर तास घ्यायला आला... त्या कोमल ह्रदयाच्या आनी आवाजाच्या मराठीच्या मास्तराने शोएब्याचा अवतार बघून 'बारगीर काय झालं रे?' म्हनून चौकशी केली... पन् शोएब्या ऐवजी हुशार पोरांनी त्याला इत्यंभूत माहीती पुरवली.... मग काही न बोलता मास्तर तास घेऊन निघून गेला.... असे अजून दोन तास संपले... माझ्या सकट मागच्या बाकावरची पोरं अधून मधून त्याच्या कडं बघायची.... मग जेवायची सुट्टी झाली अन् मागच्या बाकावरची पोरं शोएब्या भोवताल जमली तसं एवढा वेळ दम धरलेला धिप्पाड शोएब्या हुंदके देऊन ढसाढसा रडाय लागला... त्याच्या मोठ्या घोगर्या आवाजानं त्याचं रडनं लई भेसूर वाटत हुतं.... सहन न होनारं.... न बघवनारं.... शोएब्याच्या बाकावर त्याच्या शेजारी बसनारं मारवाड्याचं पोर...मधल्या बाकावरच्या पुढं पुढं करनार्या चुगलखोराला बोल्ला '****च्या... येला पाकिस्तानची टीम आवडते ते मास्तरला कशाला बोल्लास? नुसती टीमच आवडते की ... ते त्येला कशाला सांगितलास?'..... मग शोएब्या पानावलेल्या डोळ्यानं मधल्या बाकांपासून पुढच्या बाकापर्यंतच्याना बघून बोलू लागला....'**च्यांनो....हजारदा सांगितलं हुतं की पाकिस्तानची टीम आवडत्या....पाकिस्तान नव्हं रे ***च्यानो.....' पन पुढच्या बाकावरच्या पोरांकडं येळ नव्हता..... त्यांना जेवायचे होते... शर्टाच्या कॉलर पासून मना पर्यंत फाटलेलं समधं घेऊन शोएब्या मधल्या सुट्टीतच घरी गेला.... त्यानं घरी सांगितलं की नाय ?...म्हायीत नाय... सांगितलं असतं तरी त्याचा एमआयडीसीत जानारा बा शाळंत येउन काय भांडनार....पन जखम लई खोलात झालती... काही दिसानंतर दहावी संपली..... अदनं मदनं शोएब्या मार्केटात दिसायचा.... नंतर मी पुन्याला आलो त्यामुळं परत बरीच वर्ष नाय दिसला.... तीन वर्षापूर्वी कोयनेनं गावाकडं जाताना कराड स्टेशनला मार्केटींग वाले कपडे घातलेले तीघं चौघं चढले.... त्यात शोएब्या होता... गळाभेट घेत 'अरे मुफ्या.... कां हाय तू मर्दा... कत्ते दिन शी दिशा............' असा आमचा संवाद सुरू झाला...कोन कोन भेटलं...कोन कुठे...काय करतय अशी सगळी चौकशी करून शाळेतल्या आठवणींना उजाळा मिळाला....पन या घटनेचा विषय नव्हता झाला....... गाव आलं तसं आम्ही एकमेकांचा निरोप घेतला..... मोबाईल नंबरची देवाण घेवाण झालती.... पन ना त्यानं मला फोन केला ना मी त्याला..... बहुदा त्या घटनेचा ओरखडा माझ्या मनात खोलवर कुठेतरी होता.... त्यामुळंच सद्याची परीस्थिती बघून ते समधं परत आठवलं....बिछान्यात दीड दोन वाजेपर्यंत चैन पडत नव्हती ... सगळं सारखं डोळ्यासमोर यायला लागलं..... म्हनून लिवून काढलं.... आता पहाट झालीया ...नवा दिस सुरू होईल....पन एक प्रश्न सारखा मनात यायलाय की शोएब्याला पन आत्ता ही परीस्थिती बघून हे समधं आठवत असेल का?
(फक्त शोएब्याचं नाव बदललेले आहे.... बाकी माझ्या सकट सगळं जसं घडलं तसं लिहलय.... )

सोमवार, १ डिसेंबर, २०१४

"मुस्लिम मराठी साहित्य :एक सांस्कृतिक राजकारण"

रविवार दि. ९ नोव्हेंबरच्या महाराष्ट्र टाइम्सच्या 'संवादपुरवणीत 'मुस्लिम मराठी साहित्य : प्रेरणा आणि स्वरूप' संपादक / प्रा. फ. म. शहाजिंदे प्रा. फारुख तांबोळी या नव्या ग्रंथावर 'मध्यमवर्गीय आवर्तात मुस्लिम मराठी साहित्यया मथळ्यात श्री. जी. के. ऐनापुरे यांचा समीक्षा लेख आला होता. लेख पाहण्यासठी त्याचा दुवा खाली दिला आहे.
या समीक्षेतील काही बाबी मला खटकल्या मुळे त्याला प्रतिक्रिया देणारा लेख मी लिहिला असून तो म.टा. कडे पाठवला आहे. उपरोक्त समीक्षा लेख आणि त्याला माझी प्रतिक्रिया आपल्या विचारार्थ येथे देत आहे. प्रतिक्रिया, सूचनांचे हार्दिक स्वागत आहे.
"मुस्लिम मराठी साहित्य :एक सांस्कृतिक राजकारण"
- मुफिद मुजावर मो.०९७११७४२३४८
प्रा. फ. म. शहाजिंदे आणि प्रा. फारुख तांबोळी संपादित 'मुस्लिम मराठी साहित्य: प्रेरणा आणि स्वरूप' या ग्रंथावरील श्री.जी. के. ऐनापुरे यांचा रविवार दिनांक ९ नोव्हेंबर २०१४ च्या महाराष्ट्र टाइम्समधील समीक्षा लेख वाचला. श्री. ऐनापुरे यांनी आपल्या समीक्षेत मुस्लिम मराठी साहित्यातील (चळवळीतील) साहित्यकांमधील आपल्या कामाच्या जोरावर आपल्या समूहाच्या बाहेर जाणे आणि धर्मनिरपेक्षतेच्या अंगाने सांस्कृतिक पसाऱ्यात टिकून राहण्याच्यासंदर्भातील अनभिज्ञेतेवर ताशेरे ओढले आहेत. तसेच मुस्लिम मराठी साहित्यहे मध्यमवर्गीय आवर्तातअडकलेले असून मुस्लिम मराठी साहित्यअशा वेगळ्या नामांतरणानेएकत्र येण्याची धडपड करणाऱ्या लोकांच्या प्रेरणांचे स्वरूपहे स्मरणरंजनअसल्याची टीका केली आहे. ग्रंथाच्या मांडणीच्या तांत्रिक बाबींचा विचार करता या ग्रंथाची घडण ही काहीशी सैलसर आहे. बहुदा ग्रंथाच्या संपादकांनी आपले संपादकीय अधिकारांचा कमीत कमी वापर करण्याचे ठरवले असल्यामुळे असे झाले असावे. त्यामुळेच बहुदा या ग्रंथातील प्रेरणासमीक्षकाला स्मरणरंजनभासल्या असाव्यात. मात्र टीकेचा रोख या ग्रंथापुरता सीमित न राहता एकूण मुस्लिम मराठी साहित्य चळवळीला अप्रासंगिक सिद्ध करण्याकडे असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे यावर चर्चा होणे अतिशय आवश्यक वाटल्यामुळे हा लेखप्रपंच.
आधुनिकतेच्या अनुषंगाने साहित्य आणि साहित्यिकविषयक चर्चाविश्व हे निर्विवादपणे उच्चजातीय-मध्यमवर्गीय क्रियाकलापाचा भाग असतो. संतसाहित्य आणि लोकसाहित्य हे बहुतांशवेळा या चर्चाविश्वात साहित्य अभ्यासाच्यारूपातच डोकावत असतात. तरी देखील या प्रस्थापित उच्चजातीय-मध्यमवर्गीय समुदायाच्या परिघाबाहेर ढकलले गेल्याची जाणीव होऊन आत्मभान आलेले विविध वंचित समुदाय पर्यायी वैचारिक भूमिका घेऊन साहित्य निर्मिती करत संघटीत झाले. त्यामुळे दलित-ग्रामीण-जनवादी ही तसेच आदिवासी- मुस्लिम मराठी- ख्रिस्ती मराठी -जैन मराठी इत्यादी साहित्यांची फक्त नामांतरे नसून त्या त्या समूहांच्या अस्मितांचे हुंकार आहेत. या साहित्यांच्या निर्मितीची क्षणिक प्रेरणा जर फक्त वर्तमानकालीन सामाजिक पर्यावरणात असत्या तर त्या आधारावर ही साहित्याची नामांतरणेजास्त काळ वाटचाल करू शकल्या नसत्या. उदाहरण घ्यायचे झाल्यास मराठी ख्रिस्ती साहित्याच्या परंपरेची वाटचाल सतराव्या शतकातील फादर स्टीफन्स यांच्या ख्रिस्तपुराणापासून सुरवात करत एकोणिसाव्या शतकात बाबा पदमजींच्या यमुना पर्यटनआणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रेते उत्तार्धात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ओअॅसिसच्या शोधातच्या पुढे आता एकविसाव्या शतकात सुरु आहे. यावरून वर्तमान मराठी ख्रिस्ती साहित्याच्या भूतकाळातील प्रेरणा देखील अधोरेखित होतात. मुस्लिम मराठी साहित्याने देखील अशाच प्रकारे दीर्घ प्रवास केला आहे. त्यामुळे श्री. ऐनापुरे यांना मध्यमवर्गीय आदिबंधतोडू न शकणाऱ्या फिक्यामुस्लिम मराठी साहित्याची आत्ताशी सुरवात झाल्याचे जरी वाटत असले तरी ते वास्तव नाही. मुस्लिम मराठी संतकवी इसवी सनाच्या पंधराव्या शतकापासून मराठीत रचना करत असल्याचे प्रमाण उपलब्ध आहेत. या मुस्लिम मराठी संतकवींच्या रचनांची नाळ इथल्या मातीतल्या सुफी-भक्ती परंपरेशी जोडलेली होती. त्यांनी तुर्की-फारसी-अरबी ऐवजी आपल्या मायबोली मराठीतून रचना केल्या. मृत्युंजय’ ‘ज्ञानसागरानंद’ ‘कादरी बेदरी बाच्छाअसलेल्या शाह मुंतोजी ब्रम्हणी यांनी उपनिषदांचे सार | वेदशास्त्रांचे गव्हर | सिद्धान्तीचे बीजाक्षर |’ असलेल्या प्रकाशदीपची रचना केली. मीपणाचा त्याग करून परमेश्वराशी एकरूप होण्याचा योगसंग्रामज्याच्या हृदयीं गोविंदआहे अश्या अविंधशेख महंमद यांनी रचला. याशिवाय हुसेन अंबरखान, अलमखान, शेख सुलतान,शाह मुनी यांच्या सारख्या अनेक मुस्लिम मराठी संत कवींची आणि त्यांच्या साहित्याची भलीमोठी यादीच या ठिकाणी देता येईल पण विस्तारभयास्तव ती टाळणे भाग आहे. या सर्व संतकवींच्या साहित्यात जागोजागी दिसणारी सुफी-भक्ती परंपरेतील परमेश्वराशी एकरूप होण्याची ओढ, जातधर्मभेद निरपेक्ष वैश्विक मानवी मूल्ये हीच या संत कवींच्या साहित्याची प्रेरणास्त्रोत होत. 
काळपरत्वे बदलत जाणाऱ्या परिस्थिती नुसार साहित्यनिर्मितीच्या प्रेरणा बदलत जातात. आधुनिकतेच्या जाणीवांच्या सोबत छपाई तंत्रज्ञानाचा प्रसार आणि राष्ट्रवादाच्या उदयाने भारतातल्या उच्चजातीय-मध्यमवर्गाच्या साहित्य प्रेरणांना आकार दिला. त्यांनी या छपाई तंत्राचा ज्ञानविश्वावरील मक्तेदारी राखण्यासाठी उपयोग केला. तशीच मक्तेदारी त्यांनी साहित्य क्षेत्रावर प्रस्तापित करून आपल्या जात-वर्ग जाणिवांनाच मुख्य प्रवाहातील जाणीव म्हणून प्रस्तुत केले. याच काळात प्रस्तापितांच्या या साहित्य व्यवहाराला आव्हान देणारा प्रवाह महात्मा फुले आणि सत्यशोधक साहित्याच्या रूपाने पुढे आला. या प्रवाहाने जातिव्यवस्थेतील शोषणावर कोरडे ओढले आणि परीघावर ठेवलेल्या समूहांच्यावतीने आवाज बुलंद केला. महात्मा फुलेंनी तत्कालीन प्रस्थापित जातवर्गाच्या मुसलमानांच्या प्रती असलेल्या द्वेष भावनेची मीमांसा केली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात देखील जेंव्हा कादंबऱ्या आणि नाटकांमध्ये मुसलमान पात्रे ही नेहमी खलनायकाच्या भूमिकेत असायची आणि आज ही बहुतांश वेळा ती तशीच असतात, तरी देखील फुल्यांच्या तृतीय रत्न मध्ये मुसलमान पात्र तटस्थ भूमिकेतून डोकावते. इस्लाम आणि महंमद पैगंबरांच्या संदर्भातील युरोपकेंद्रित पौर्वात्यवादी आकलनाच्या प्रभावात इथले विचारवंत असताना देखील फुल्यांनी महंमद झाला जहामर्द खरा || त्यागीले संसारा || सत्यासाठी ||’ अशी सुरवात असणारा मानव महंमदसारखा अखंड रचला. 
राष्ट्रवादाच्या चर्चाविश्वात मुसलमानांना परीघावर ढकलले जात असताना, इतिहासात आणि ऐतिहासिक साहित्यात मुसलमानांचे जुलमी, रानटी, गोहत्या करणारे, बायका पळवणारे, हिंदूंचा धर्मच्छळ करणारे, मंदिरे पाडणारे अशा प्रकारचे प्रस्तुतीकरण विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात प्रचंड वाढले. याला राष्ट्रीय सभेच्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाला विरोध करणारे मुस्लिम लीग आणि हिंदू महासभेचे परस्पर विरोधी मात्र गुणात्मक दृष्ट्या एकसारखे असणारे राष्ट्रवाद कारणीभूत होते. या काळात मुस्लिम मराठी साहित्यिक-विचारवंत-स्वातंत्र्यसैनिकांनी धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाची कास धरत साहित्य निर्मिती केली. यातले बरेच साहित्यक-विचारवंत-इतिहासकार मराठी वैचारिक चर्चाविश्वाच्या स्मृतीपटलावरून नाहीसे झाले. यांपैकी मियां सिकंदरलाल अत्तार यांनी १९२३-२४ मध्ये इस्लाम-दर्शननावाचे त्रैमासिक चालवले. यात त्यांनी विविध प्रकारचे ऐतिहासिक लेख प्रकाशित केले. इतिहासलेखनातील मुसलमानांच्या विकृत प्रतिमा खोडून काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता असे दिसून येते. जवळपास पंचवीस वर्षे या व्यक्तीने तत्कालीन सातारा जिल्ह्याच्या परिसरात पायपीट करून ऐतिहासिक कागदपत्रे, मराठीतील मोहरमचे जंगनामे आणि जुन्या वस्तू संग्रहित केल्या. सध्याच्या सांगली जिल्ह्यातील भिलवडी गावातून पुण्यापर्यंत प्रवास करून त्यांनी वेळोवेळी भारत इतिहास संशोधक मंडळात आपल्या शोधनिबंधांचे वाचन केले. अत्तारांच्या प्रमाणेच सांगली शहराचे असलेल्या सय्यद अमीन यांनी इतिहास, तत्वज्ञान आणि थोर व्यक्तींची चरित्रे यांवर भरपूर लिखाण करून ती ग्रंथमालेच्या रुपात प्रसिद्ध केली. मुसलमानांना शिवाजी महाराजांचे शत्रू म्हणून हिणवले जात असताना त्यांनी महापुरुष छत्रपति शिवाजीसारखा सर्वधर्मसमभावी आणि सहिष्णू महाराजांचे चित्रण करणारे चरित्र लिहिले. मुसलमानांना तुच्छतेने पॅन-इस्लामवालेआणि लीगीम्हटले जात असल्याच्या काळात तुर्कस्तानातील आधुनिक-धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे प्रणेते असलेल्या अतातुर्क कमाल पाशायांचे चरित्र अमीन यांनी लिहून प्रकाशित केले. इस्लामची स्थापना आणि महंमद पैगंबर यांच्या मागील मानवी मुल्यांविषयी मराठी जनमानसाला माहिती देणारा हजरत महंमद पैगंबरहे चरित्र देखील त्यांच्या लेखणीतून साकारले. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे मानसिंग कुमठेकर यांनी अतिशय परिश्रमाने आणि चिकाटीने अत्तारांचे साहित्य संग्रहित करून त्यांचे कार्य प्रकाशात आणले. सय्यद अमीन यांचे सुपुत्र सिकंदर अमीन यांनी निस्पृहपणे आपल्या पित्याचे कार्य जिवंत ठेवण्यासाठी सय्यद अमीन यांचे ग्रंथ पुर्नमुद्रित केले. कुमठेकर आणि सिकंदर अमीन यांच्या या योगदानामुळे अत्तार आणि अमीन यांचे कार्य आणि साहित्य विस्मरणाच्या गर्तेतून बाहेर आले पण अजून ही कित्येकांना या गर्तेतून बाहेर काढणे बाकी आहे. अत्तार आणि अमीन या दोघांच्या कार्यकाळात १०-२० वर्षाचे अंतर असून देखील या दोघांनी आपल्या प्रकाशित होणाऱ्या साहित्याला इस्लामी साहित्यकिंवा मुस्लिम साहित्यअसे नाव न देता मराठी मुस्लिम साहित्य’ ‘मुस्लिम मराठी साहित्यआणि महाराष्ट्र मुस्लिम साहित्यअशी नावे दिली. तत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने त्यांना जे प्रश्न भेडसावत होते, त्यांच्या ज्या जाणीवा जागरूक झाल्या होत्या उदाहरणार्थ मराठी मुस्लिम भाषिक, सांस्कृतिक तसेच प्रादेशिक अस्मिता, जमातवादाचा प्रश्न, सर्वसमावेशी धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद, मानवी मुल्ये इत्यादींचा प्रभाव त्यांच्या लेखणीवर पडल्याचे दिसते. हेच प्रश्न आणि याच जाणीवा त्यांच्या साहित्याच्या प्रेरणा ठरल्या. 
स्वातंत्रोत्तरकाळात नेहरूवादी सर्वधर्मसमभावी राष्ट्रवादाचा प्रभाव साहित्यकांवर आणि अभ्यासकांवर राहिला आहे. प्रा. यु म पठाण यांनी आपल्या संतसाहित्याच्या आणि मराठी भाषेच्या अभ्यासातून समन्वयवादी भूतकाळाची मांडणी केली. श्री. ऐनापुरे यांनी उपहासाने त्यांचा एकमेवअसा उल्लेख केला आहे. वसाहतपूर्व काळातील फार्सी आणि मराठी मधील संबंध शत्रुभावी मानून मराठी भाषेवर फार्सी भाषेने आक्रमणकेल्याची मांडणी केली जात होती. याकाळात अत्यंत परिश्रमाने मराठी आणि फार्सी या दोन्ही भाषांचा अभ्यास करून फार्सी आणि मराठी या भाषांमधील अनुबंधसमोर आणण्याचे काम प्रा. यु. म. पठाण यांनी केले त्या अर्थाने ते एकमेवच ठरतात. 
श्री. ऐनापुरे यांनी एकोणीस साहित्यिक, अभ्यासक आणि कार्यकर्त्यांचे बावीस लेख असलेल्या या ग्रंथातील चार-पाच लेखांची दखल घेतलेली दिसते. ही दखल देखील बहुतांशी टीकात्मकच आहे. एकदा या लेखना स्मरणरंजनघोषित केले की त्यांची दखल नाही घेतली तरी चालते अशी श्री. ऐनापुरे यांची धारणा असावी. जर स्मरणरंजनहे आत्मकथनाच्या मार्गाने जात असेल आणि त्याद्वारे जीवनात आलेल्या अनुभुतींआणि त्याविरोधाचा आक्रोश आणि अस्मितांचे हुंकार ह्याच जर त्याच्या साहित्याच्या प्रेरणा असतील तर आत्मकथनांना अदखलपात्र ठरवणे हे कितपत योग्य आहे? या ग्रंथातल्या प्रत्येक साहित्यिकाच्या या स्मरणरंजनामध्ये मुस्लिम आहे म्हणून मराठी साहित्यवर्तुळातून नाकारले जाण्याची वेदना दिसून येत नाही का? ‘अहो तुम्ही मुस्लिम असून इतकी चांगली मराठीत कसे बोलता/लिहिता/कविता करता?’ अश्या प्रश्नांना सामोरे जावे लागण्याची व्यथा दिसत नाही का? हे नाकारलेपण, ही परीघा बाहेर ढकलले जाण्याची जाणीव या साहित्याच्या प्रेरणा होऊ शकत नाहीत का? शिवणकामाचा व्यवसाय करणाऱ्या दिवंगत गजलकार मलिक नदाफ यांच्या कबीर समाज विणत गेला| मलिक समाज शिवत गेला||’ या ओळी मध्यमवर्गीय आवर्तातअडकल्या आहेत असे म्हणता येईल का? जावेद पाशांच्या कथेतील ममदू खाटीक’, ‘भंगारवाल्या कडे काम करणारी रशिदा’, ‘रहेमान रिक्षावाला’, ‘लालबेगी समाजातला अब्दुल्लाहे काय मध्यमवर्गीय आहेत
शासनाच्या धोरणांच्याद्वारे, राजकीय पक्षांच्या भूमिकेमधून, जमातवादी शक्तींच्या प्रचारामधून आणि मूलतत्त्ववादी विचारांच्या प्रसारामधून मराठीऐवजी उर्दूही मुसलमानांची मातृभाषाआहे असे ठसवले जात असतानाच्या परिस्थितीमध्ये देखील मराठी मुस्लिमांनी मराठीत साहित्यनिर्मिती करणे आणि मराठी भाषिक अस्मितेच्या आधारावर एकत्र येणेहा विद्रोहनाही का? अशाप्रकारचा विद्रोहकरणाऱ्या साहित्याचे स्वरूप हे कडव्या धार्मिकतेला, जमातवादी राजकारणाला, जागतिकपातळीवर भांडवलशाही साम्राज्यवाद जो संस्कृतींच्या(?) संघर्षाच्यानावाने भ्रम निर्माण करतो आहे त्याला विरोध करण्याचे नाही का? श्री. ऐनापुरे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या 'थॉट्स ऑन पाकिस्तान' चा उल्लेख केला आहे. या ग्रंथातील आंबेडकरांच्या विचारांना मोडतोड करून भगव्या रुपात ढाळण्याचा प्रयत्न मध्यंतरी केला गेला. या प्रयत्नांना डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी डॉ. आंबेडकरांचे मुस्लिमविषयक विचार: विपर्यास आणि वस्तुस्थितीया सुगावा प्रकाशनाच्या पुस्तकाद्वारे जोरदार चपराक लगावली आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या या ग्रंथाला घेऊन मुसलमानांवर प्रश्नचिन्ह उभे करणे हे जमातवादी राजकारणाला बळी जाणे ठरेल. आंबेडकरी प्रेरणा मानून मुस्लिम मराठी साहित्याच्या स्वरुपाची व्याख्या करू पाहणाऱ्या मुस्लिम मराठी साहित्यातील अनेक प्रवाहातील एका प्रवाहाचा कॉ. विलास सोनवणे यांनी केलेल्या उल्लेखाकडे श्री. ऐनापुरे यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. बहुदा कॉ. सोनवणें यांनी आपल्या मार्क्सवादी आक्रमकतेनेहमीद दलवाई यांच्या वर केलेल्या टीकेवर श्री. ऐनापुरे यांनी भर दिल्यामुळे असे झाले असावे. हमीद दलवाई यांनी उपस्थित केलेला मुस्लिम प्रश्ननंतरच्या काळात उजव्या जमातवादी संघटनाच्या अजेंड्यावर आला याला इतिहास साक्षीदार आहे. मुस्लिम स्त्रियांचे स्थान आणि तलाकचा प्रश्नासाठी इस्लामवर आणि मुसलमानांवर टीका करण्याच्या नादात याप्रश्नांच्या मागील पुरुषसत्ताक विचारसरणीकडे केले गेलेले दुर्लक्ष्य मुसलमानांना भलतेच महागात पडले आहे. १९९२ नंतर बुरख्याचा वापर का वाढला याचा देखील जमातवाद-पुरुषसत्ता आणि स्त्रिया या संदर्भाने विचार करणे आवश्यक आहे. 
मुस्लिमांनी आपल्या देशभक्ती सिद्ध करावीया उजव्या विचारसारणीच्या अपेक्षे(?)प्रमाणे धर्माच्या जागतिक साठमारीत (मुस्लिम की ख्रिश्चन?)’ कोणाची बाजू घ्याची हे स्पष्ट करण्याची अपेक्षा(?) श्री. ऐनापुरे व्यक्त करतात. श्री. ऐनापुरे ज्याला जागतिक साठमारीम्हणतात तो जागतिक भांडवलशाही साम्राज्यवादाने संस्कृतींचा संघर्षया नावाखाली उभा केलेले भ्रामक वास्तव आहे, त्याचा उल्लेख प्रा.सलीम पिंजारी यांच्या लेखात आला आहे. कॉ. विलास सोनवणे यांनी या जागतिक भांडवलशाही साम्राज्यवादाच्या संस्कृतींचा संघर्षया भ्रामक वास्तवाला आणि मुस्लिम म्हणून एकसंघ-एकात्म-एकजिनसी (होमोजिनस) समूह असल्याच्या मिथकाला, मुस्लिमांच्या विषयी खोटी मिथके बनवण्याच्या जमातवादी सांस्कृतिक राजकारणाला मुस्लिम मराठी साहित्य हे फक्त समर्पक उत्तर नसून मराठी भाषा लिहिणाऱ्या-बोलणाऱ्या, मराठी अस्मिता जपणाऱ्या, मराठी मुस्लिमांचे या शक्तींच्या विरोधातले धारदार सांस्कृतिक राजकारण असल्याचे म्हटले आहे. कॉ. सोनवणे नेहमी म्हणतात त्याप्रमाणे, ‘महाराष्ट्राच्या कुठल्याश्या कोपऱ्यातील एखाद्या गावातील अथवा निमशहरी भागातील फारुख/सलीम/जावेद अशी नावे असलेला किंवा अशाच प्रकारची दुसरी नावे असलेला दुसरा कोणीही प्रमाणबद्ध(?) मराठी जरी त्याला येत नसली तरी आपल्या मोडक्या तोडक्या(?) मराठीत जेंव्हा आपल्या प्रेयसी प्रति आपल्या प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी कवितेच्या चार ओळी लिहितो तेंव्हा तो आपोआप भांडवली साम्राज्यवादी-जमातवादी सांस्कृतिक राजकारणाविरुद्ध त्याच्या मायबोली मराठीचा झेंडा हाती घेऊन उभा ठाकतो’. पण हे साहित्याचे सांस्कृतिक राजकारण साहित्य आणि साहित्य अभ्यासातील आनंदयात्रींना कोण समजावणार.